पत्रकारांवरील हल्ला नव्हे, तर लोकशाहीवरील हल्ला – नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले
जालना | प्रतिनिधी
जालना शहरातील दोन पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्यांच्या घटनांमुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले यांनी या घटनांचा जाहीर निषेध करत, “हा केवळ पत्रकारांवरील हल्ला नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि लोकशाही व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा जगाचे जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना त्यांच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकावल्याची घटना घडली. “बातम्या बंद कर, अन्यथा गोळ्या घालू,” अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच दिव्यांग वार्ताचे संपादक राहुल मुळे यांना राजूर रोडवरील घाणेवाडी शिवार परिसरात नेऊन तब्बल पाच तास एका छोट्या खोलीत कोंडून ठेवत बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्र हादरून गेले असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या दोन्ही घटनांबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले म्हणाले की, “पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात. जनतेच्या समस्या, विकासकामे, अन्याय-अत्याचार, भ्रष्टाचार आणि समाजहिताच्या विविध बाबी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारा प्रत्येक हल्ला हा सत्य दडपण्याचा आणि लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले की, “पत्रकार निर्भीडपणे समाजातील घडामोडी जनतेसमोर आणतात. त्यामुळे काही समाजकंटकांकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचे आणि त्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते अत्यंत गंभीर आहे. अशा प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहेत. पत्रकार सुरक्षित राहिले तरच जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचू शकते.”
काठोटीवाले यांनी संबंधित प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
शहरातील विविध सामाजिक संघटना, पत्रकार संघटना आणि नागरिकांनीही या घटनांचा निषेध व्यक्त केला असून पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
“पत्रकारांना गप्प बसविण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा आहे,” असेही नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले यांनी स्पष्ट केले.